Tuesday, September 28, 2010

पुढच्या वर्षी लवकर या...

गणपती बाप्पा आले म्हणता म्हणता बुधवारी आपल्या घरी गेले सुद्धा. जितक्या प्रेमाने आपण बाप्पाला घेऊन येतो तितक्याच जोशात त्याला परत त्याच्या घरी पाठवतो जेणे करून तो पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने, आनंदाने परत येईल. पण इथेच गडबड होते. 'जोश मे होश खो देना' हेच बहुतेक वेळा बघण्यात येते. धांगडधिंगा पेक्षा गदारोळ आणि हैदोस जास्त जाणवतो. त्यातच खिसेकापूपासून मवाल्यानपर्यंत सगळ्यांचीच चंगळ होते. बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या आयाबायांना त्रास देणे, दारू पिऊन गदारोळ करणे ह्या गोष्टी पण घडतात. तरुणाईचा हा बेधुंद पणा बघून जेव्हा देशाच्या भविष्याची काळजी वाटायला लागते तेव्हा पिवळ्या टोपीतून आशेचा किरण डोकावू लागतो. काय म्हणता पिवळी टोपी नाही माहित? अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या गणवेशाचा अविभाज्य भाग. पुरुषांसाठी काळी विजार आणि सफेद शर्ट व स्त्रियांसाठी काळी सलवार  सफेद कुर्ता व काळी ओढणी आणि डोक्यावर पिवळी टोपी. गणेश मुर्ती विसर्जनच्या वेळी हे कार्यकर्ते पोलिसांना गर्दी नियंत्रण तसेच ट्राफिक कंट्रोल साठी मदत करतात. एकीकडे हुल्लडबाजी करणारा जमाव किवा नुसतेच बघे, तसेच एका बाजूला गर्दी मध्ये अडकणारे साधेसुधे भाविक, अशा लाखो लोकांमध्ये हे शिस्तप्रिय कार्यकर्ते अधिकच उठून दिसतात. ह्यातील तरुण कार्यकर्त्यांची संख्या तर लक्षणीय आहे. हे सर्व कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्धतेने आपले काम चोख पार पाडत असतात. पोलिसांना पण त्यांचा आधार हवासा असतो. आपल्या सद्गुरूच्या प्रेमाखातर आणि सामाजिक भान सांभाळत हे कार्यकर्ते आपल्या सेवे मध्ये तल्लीन झालेले असतात. मग पाउस येवो अथवा कडक ऊन पडो, त्याची फिकीर त्यांना नसते. आपल्या सद्गुरूचा शब्द त्यांच्या साठी सर्वकाही असतो. कुठल्याही प्रकारचे मानधनच काय पण साधा इतरांकडून चहा- नाश्ता सुद्धा स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी खाण्याची, जेवणाची सोय सुद्धा संस्थेतर्फेच केली जाते. सद्गुरू बापूंना अभिप्रेत असलेली निष्काम भक्तिमय सेवा करणे हेच प्रमाण मानतात. हे DMVS  अशा सामाजिकच नव्हे तर सर्व प्रकारच्या आपत्तींना सामोरे जाण्यास तत्पर आहेत. ह्या सगळ्याची गरज काय? हे तर पोलीस आणि सैन्याचे काम आहे, अशीच आपली सर्वांची धारणा असते. पण येणाऱ्या काळातील तिसरे महायुद्ध फक्त सीमेवर नाही तर घराघरातून लढले जाणार आहे ह्याची झलक आपल्याला नजीकच्या घडामोडींमधून कळत आहेतच. अशा वेळी आपण सीमेवर लढणाऱ्या जवानांवर भार न बनता, स्वतःच कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम असणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीव रोजच वर्तमान पत्र उघडलं की लक्षात येते. डॉ अनिरुद्ध जोशींनी (अनिरुद्ध बापूंनी) लिहिलेल्या 'तिसरे महायुद्ध' ह्या पुस्तकात लिहिलेल्या कित्येक गोष्टी आज घडताना आपण पाहतो. त्यांचा द्रष्टेपणा व पुढील काळाची गरज ओळखूनच डॉ अनिरुद्ध जोशींनी अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना केली आहे ती स्वतः केलेल्या अभ्यासातून आणि कष्टातून. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हेच ह्या ऍकेडमीचे ब्रीदवाक्य आहे. आणि सद्गुरू कृपेनेच ते पूर्णत्वास जाणार हे निश्चित.

2 comments:

Mannmath said...

Nicely written Prii...keep it up.....

Niwass said...

Awesome Preetiveera....

Very Well Written...